सोमवार, 21 दिसंबर 2020

धम्म म्हणजे काय?

धम्म म्हणजे काय?

धम्म हा पाली भाषेतला शब्द आहे. जसा संस्कृत मध्ये  धर्म तसा पाली मध्ये  धम्म. 

परंतु भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म हा ब्राह्मण धर्माच्या बिलकुल उलट आहे. ब्राह्मण धर्म हा अद्यात्मावर आधारलेला आहे आणि बौद्ध-धम्म हा विज्ञानावर उभा आहे.

धर्म माणसाला दैव-वादी बनवतो; तर धम्म माणसाला आंतरिक मनोबल प्रदान करतो. 

धम्म म्हणजे सामाजिक विज्ञान. धम्म म्हणजे सामाजिक क्रांती. धम्म म्हणजे सामाजिक बांधिलकी, धम्म म्हणजे सामाजिक आत्म-सम्मान!

लोक धर्मांध होवु शकतात परंतु धम्मांध होवु शकत नाहीत. कारण धम्म माणसाला विज्ञानवादी बनवतो. धम्माचे पालन केल्याने लोकांचे डोळे उघडतात. नैतिकते वर आधारित समाज रचना होते. लोक जागृत होतात. अन्याय सहन करत नाहीत कारण त्यांच्या कडे सम्यक दृष्टी असते. अन्याया विरुद्ध लढण्यास तयार होतात. बंधु-भाव निर्माण होतो. प्रेम-जिव्हाळा निर्माण होतो. याच प्रेमाचे रुपांतर सामाजिक संरक्षणात होते. 

धम्मा मुळे लोक समाजाच्या उद्धारासाठी सतर्क व कार्यरत राहतात.
धम्म पाळणारे लोक सामाजिक अभ्यास करतात. जर त्यांना समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधु-भाव या तत्वांचा समाजा मध्ये अभाव आढळला तर ते सम्यक दृष्टि वापरुन ही बुद्ध-तत्वे सामाजात पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्राण पणाला लावतात.  

धर्मांधता म्हणजे धर्मासाठी काही पण करणे. धर्माचा गर्व बाळगणे, पुजा-पाठ करणे, जातियता पाळणे, व्रत-वैकल्य पाळणे. ज्या गोष्टी स्वार्थासाठी आहेत त्या सर्व करणे, धर्मासाठी माणुसकी विसरुन इतर धर्मियांना त्रास देणे.

त्याच प्रमाणे धम्मांधता म्हणजे बौद्ध-धम्मा साठी काही ही करणे. अंद्धश्र्द्धाळु होवुन पुजा-पाठ करणे, धम्माची शिकवण अमलात न आणने (धम्म को मानते है; धम्म की नही मानते), आप-आपसात भेद-भाव करणे, गट-तट निर्माण करणे, स्वार्थासाठी समाजाला धोका देणे, बौद्ध-धम्मा बद्धल गर्व बाळगणे, बुद्धाला देव माणुन त्यांची पुजा करणे, बौद्ध-धम्मा बद्धल कोणी चुकीचे बोलले की त्याचे अद्न्यान न मिटवता त्याच्यावर प्रहार करणे, हिंदु-लोकांवर बौद्ध-धम्म जबरदस्तीने लादणे वगैरे म्हणजे धम्मांधता.

असा खोटा धम्म किंवा धर्म पाळणारे स्वता:ला उच्चभ्रु समजतात. अज्ञानी किंवा निरागस लोकांना ते गुलाम समजतात. त्यांना वाटते की ते धम्माचे पालन करतात म्हणुन ते महान आहेत व इतर जे पालन करत नाहीत ते मुर्ख आहेत. 
हा पूर्वाग्रह समाजासाठी धोकादायक आहे. जर तुम्ही धम्म पाळता तर इतरांनी सुद्धा तो पाळला पाहीजे या साठी तुम्ही प्रयत्न केले पाहीजे. लोकांना हीन वागणुक देवुन तुम्ही स्वता: धम्माचा अवमान करता. सामाजिक विषमता पाळता. मग हिंदु धर्मा मधे आणि तुम्ही पाळत असलेल्या धम्मा मधे काय फरक?

बौद्ध-धम्मात असे काही ही करणे चुकीचे आहे. धम्म म्हणजे बौद्ध लोकांची अस्मिता. तो बदनाम होता कामा नये.

धम्म हा माणसासाठी आहे माणुस धम्मा साठी नाही असे बाबासाहेबांनी प्रखरशाने सांगितले आहे.

बुद्धाने सुद्धा त्यांचा धम्म कोणावर लादला नाही.बुद्धिच्या कसोटी वर तपासुन मग स्विकारा असे सांगितले आहे. 

बौद्ध-धम्म तर्क करावयस लावतो. सामाजासाठी जे योग्य आहे तेच करावयास सांगतो. सामाजिक अज्ञान दूर करण्यास सांगतो. समाजाला सुज्ञानी बनवण्यास सांगतो.

समाजाच्या कल्याणासाठी जे काही करतो तोच खरा घम्म. 

जर बौद्ध-धम्मातील लोक धम्मांध होत असतील तर ते खोट्या बौद्ध-धम्माचे पालन करत असावेत किंवा त्यांना धम्म म्हणजे काय याची खरी ओळख नसावी. 

बौद्ध-धम्म म्हणजे अधम्माविरुद्ध लढा. अधम्म म्हणजे सामाजाचे होणारे अर्थिक, मानसिक, शैक्षणिक आणि सामाजिक शोषण. या शोषणा विरुद्ध, या अन्याया विरुद्ध जर आपण लढलो नाही तर आपल्याला मिळालेल्या बौद्ध-धम्माचा उपयोग तो काय??

धम्म म्हणजे वैचारिक लढा. धम्म सांगतो बुद्धिला शरण जा! कारण बुद्धी वापरल्याने सामाजिक आजार शोधता येतो व त्यावर उपाय सुद्धा करता येतो. धम्म सांगतो धम्माला शरण जा म्हणजेच लोक-कल्याणाच्या मार्गावर चाला. धम्म सांगतो संघटित रहा म्हणजेच समाजाचे रक्षण करा; न्याय व समतेसाठी एकत्र येवुन संघर्ष करा.

“Give a man a Fish, and you feed him for a day; show him how to catch fish, and you feed him for a lifetime”. 

वरिल म्हणी मध्ये धम्म लपलेला आहे. एखाद्या व्यक्तिला तुम्ही दान करा; तो धर्म आहे. परंतु त्याच व्यक्तिला तुम्ही उपजिविका कशी कमवायची याचे ज्ञान द्या, त्याच्या मधे आत्मविस्वास व स्वाभिमान निर्माण करा. तो जीवन भर भिक न मागता सम्यक मार्गाने स्वता:चे पोट भरण्यास तत्पर होईल. याला समाज प्रबोधन म्हणतात! यालाच धम्म म्हणतात. 

लोकांच्या मुलभूत विचारांत अमुलाग्र बदल घडवुन आणने म्हणजे धम्म.

बुद्धाने सुद्धा लोकांमधील न्युनगंड काढण्यासाठी काही मार्ग आखुन दिले आहेत. या मार्गांचा आपण जर सखोल अभ्यास करुन अवलंब केला तर आपण नक्कीच स्वाभिमानी जीवन जगु. 

अत्त-दीप-भव: म्हणजे न्युनगंड त्यागुन स्वता: स्वता:चा मार्ग-दाता व्हा! आत्मसन्मान जाग्रुक करा! स्वाभिमानी व्हा! जाग्रुत राहुन सद्धम्माचा प्रचार प्रसार करा.

बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध-धम्मच दिला कारण लोकांचा ब्राह्मण धर्मा मुळे खचलेला स्वाभिमान बौद्ध-धम्माच्या पालन करण्याने पुन्हा जागृत होवु शकतो अशी त्यांची खात्री होती. जेंव्हा लोक स्वाभिमानी होतात तेंव्हा त्यांना कोणी ही हीनवू शकत नाही. ते सर्व समाजाचे रक्षणकर्ता होतात. जागृत समाजाला कोणी ही फसवु शकत नाही.

 ‘गुलामाला गुलामगिरीची ‘जाणीव करुन द्या’ म्हणजे तो बंड करुन उठेल’ असा संदेश बाबासाहेबांनी आम्हाला दिला. अशी ‘जाणीव’ करुन देणे म्हणजेच धम्म. 

बौद्ध-धम्मा मुळे आम्हाला ज्ञान मिळाले आणि त्या ज्ञानाने आम्ही आमची गुलामी ओळखली. गुलामी ओळखुन आम्ही गप्प नाही बसलो तर वेग वेगळ्या संघटनां मार्फत आम्ही आमच्यावर होणार्या अन्याया विरुद्ध बंड करत आहोत. 
परंतु एक वर्ग असा निर्माण झाला आहे जो बुद्धाला देव मानतो आणि धम्माला अध्यात्म मानतो. अन्याया विरुद्ध लढणे तर दुरच, त्यांना अन्याय म्हणजे काय याची भनक सुद्धा नसते.

अष्टांगिक मार्ग, प्रज्ञा-शिल-करुणा, अत्त-दीप-भव: अशा अनेक बुद्ध वचनांचे या लोकांना ज्ञान नसते.

अशा लोकांचे मुख्यत: प्रबोधन होणे गरजेचे आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धाचा खरा इतिहास त्यांना पटवुन दिला पाहिजे. बौद्ध-धम्म हा विज्ञानवादी कसा हे त्यांना पटवुन दिले पाहिजे. 

बुद्धाने ब्राह्मणवादी व्यवस्थे विरुद्ध लढा देवुन भारतात समता व न्याय प्रस्थापित केले हे या लोकांना पटवुन दिले पाहिजे. या सर्व गोष्टिंची त्यांना ‘जाणीव’ करुन दिली तरच ते बंड करुन उठतील. नाही तर बौद्ध धम्मा मधे ते हिंदु-धर्म घुसवुन बौद्ध-धम्माला संपवतील. 

जर लोक बुद्ध-धम्मा मधे अंधश्रद्धा पाळत असतील व तेव्हढ्यासाठीच बौद्ध-धम्माचा वापर करत असतील तर बाबासाहेबांचा हा गाढा खूप मागे जाईल यात तीळ मात्र शंका नाही; कारण अंधश्रद्धा आणि हिंदु-धर्म हे ब्राह्मणवाद्यांचे मुख्य हत्यार आहेत. 

बुद्ध-धम्माची व्याख्या स्वता: भगवान गौतम बुद्धाने खालील प्रमाणे केली आहे:
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकनुकंपाय, हिताय, सुखाय, आदी कल्याण, मध्य कल्याण, अंति कल्याण’

याचा अर्थ बौद्ध-धम्म हा वयक्तिक नसुन तो समाजाचे हित साधणारा मार्ग आहे. लोकांचे प्रश्न सोडविणे हाच बौद्ध-धम्माचा मुख्य हेतु होय! 

आपण धम्मांध होउन बौद्ध-धम्म फक्त स्वता:पूर्ता मर्यादित ठेवला आहे. स्वता: पुर्ता मर्यादित म्हणजे धम्म पाळुन ‘बुद्ध-क्रुपेने’ स्वार्थाची अपेक्षा करणे. समाजाचे प्रश्न विचारात न घेणे. समाजाच्या उत्थाना साठी न झटणे. 

स्वता: पूरता बौद्ध-धम्म मर्यादित ठेवणे म्हणजे बौद्ध-धम्माचा र्हास होय! 
धम्म कार्य म्हणजे समाज कार्य. समाज कार्य म्हणजे देश-भक्ति. 

खर्या बौद्ध-धम्माचा जेव्हडा प्रचार-प्रसार होईल तेव्हडा आपला देश प्रगत होईल.

समाजाच्या हिता साठी, समाजिक शोषणा विरुद्ध जो बंड करतो आणि जो समाजासाठी आपले तन-मन-धन अर्पण करतो तोच खरा बौद्ध-धर्मिय! तोच खरा बुद्धिस्ट! 

“बौद्ध धम्म तीन सिद्धांताची दीक्षा देतो; प्रज्ञा, करुणा आणि समता. बौद्ध धम्म जागातील शोषण थांबवू शकतो. माझा असा विश्वास आहे की, एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सारं जग बौद्ध-धम्माचा स्वीकार करेल”.
- डा.बाबासाहेब आंबेडकर

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ