शनिवार, 7 नवंबर 2020

विद्यार्थी दिवस

 
विद्यार्थी दिवस'- " ७ नोव्हेंबर" हा दिवस

    *भारतीय संविधानाचे शिल्पकार, कायदेपंडित,राष्ट्रनिर्माते, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस.* राज्यातील शाळा व महाविद्यालायामध्ये  *'विद्यार्थी दिवस '* म्हणून साजरा करण्याबाबत ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाने घेतला आहे.
 *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. कारण डॉ.बाबासाहेबांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वतः उच्चशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले. एवढेच नाही तर संपूर्ण स्त्रियांचे कोट्यवधी बहुजनांचे, दलितांचे ,वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत गेल्यामुळे ते भारतीय संविधानाचे शिल्पकार ठरले. या संविधानामुळे भारतीय संपूर्ण समाजात स्वातंत्र, समानता, बंधुता व न्याय ही मूल्य रुजली.*
 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिवस हा अत्यंत महत्त्वाचा व इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारी घटना आहे.
    ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा  येथील राजवाडा चौक मधील  प्रतापसिंग राजे हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता. या ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगाची नोंद आजही १९१४ नंबर वरती आहे. हा पहिला दिवस ऐतिहासिक नोंदीनुसार ७ नोव्हेंबर हा दिवस *विद्यार्थी दिवस* म्हणून शाळा व महाविद्यालयात साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर  निबंध स्पर्धा, वक्तृत्व , काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. 
*शालेय वयातील मुलांना शिक्षणाचे महत्त्व कळावे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत त्यातून भावी पिढी घडावी हा मुख्य हेतू आहे.*
    *शिक्षणाचे असलेले अनन्य साधारण महत्व डॉ. बाबासाहेबांनी पुरेपूर जाणले होतेच. कारण शिक्षणाने आर्थिकच नाही तर सामाजिक आणि खऱ्या अर्थाने सर्वांगीण उन्नती होते याची जाणीव होते.* 
त्यामुळेच बाबासाहेबांनी  *'शिका'* हा संदेश दिला.
*हा संदेश जो समाज शिक्षणापासून , ज्ञानापासून वंचित आहे त्यासर्व समाजाने शिक्षणाचा ध्यास घेऊन ज्ञानी बनावे, प्रज्ञावंत बनावे हा मुख्य उद्देश होता. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब स्वतःला आजन्म विद्यार्थी असल्याचे मोठ्या अभिमानाने सांगत असत.* कारण ज्ञान केवळ लहान वयातच मिळवीता येते असे नाही तर शिक्षणाला वयाची कोणतीही अट नाही. ज्ञानाचा महासागर हा अथांग आहे. ते घ्यावे तेवढेच कमी आहे.त्यामुळेच डॉ.बाबासाहेबांनी विविध ज्ञान शाखांचा अभ्यास केला. केवळ अभ्यासच नाही तर त्यावर मास्टरी मिळविली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थान माणून त्यांनी दिलेला संदेश मोलाचा मानून, त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून ज्या- ज्या लोकांनी,  समाजाने वाटचाल केली त्यांची खऱ्या अर्थाने प्रगतीच झाली आहे. 
       *हिंदू धर्मातील समाज व्यवस्थेने शिक्षण आणि ज्ञान हे ब्राम्हण वर्गासाठीच  राखून ठेवले होती.(वरचा वर्ग)ही ज्ञानबंदी हजारो वर्षे कायम होती.त्या विरोधात जाऊन कोणी ज्ञान मिळविण्याचा , शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला ठार मारण्यापर्यंतच्या कठोर शिक्षेची तरतूद इथल्या हिंदू धर्म व्यवस्थेने करून ठेवली होती.* याची अनेक उदाहरणे इतिहास आणि पुराणाच्या पाणा-पाणावर मिळतात.  यात शंबुक आणि एकलव्य देखील आहे. ही उदाहरणे हेच सांगतात की ज्ञानबंदी किती कठोर होती आणि त्याची किती काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत होती, हा प्रकार हजारो वर्षे चालला होता.
   *शिक्षण आणि ज्ञान ही मूठभर लोकांचीच मक्तेदारी बनली होती.* अशी प्रतिकूल सामाजिक परिस्थिती असल्याने बहुसंख्य लोक शिक्षणाच्या वाटेलाही जात नसत. 
*बदलत्याकाळानुसार आणि महामानव महात्मा फुले आणि इतर शिक्षण प्रेमी महापुरुषांमुळे ही परिस्थिती बदलत गेली आणि शिक्षणबंदी सैल झाली.*
 *शिक्षणाचे असलेले महत्त्व  राष्ट्रनिर्माते, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पुरेपूर ओळखले होते , शाळेत वर्गाबाहेर बसून त्यांनी १८-१८ तास अभ्यास केला, आणि तोच संदेश आपल्या समाजाला आणि शिक्षणापासून वंचित समाजाला दिला. याचे ज्यांनी-ज्यांनी महत्त्व ओळखले त्यांच्या जीवनाचे सोनंच झालं.*
        *त्यामुळेच ७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवसाचे महत्त्व जास्त आहे.* यात केवळ *व्यक्तीचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाची, आणि पर्यायाने देशाचीही प्रगती होते.* 

  *आजही कोट्यवधी लोक शिक्षणाच्या मुख्यप्रवाहापासून वंचित आहेत.इथल्या समाज व्यवस्थेनेच धार्मिक ग्रंथानुसार बहुजनांना शिक्षणाची संधी नाकारली होती.*
*व्यवस्थेलाच बदलण्याचे हत्यार हे शिक्षणाच्याच माध्यमातून मिळणारे आहे*.
  नेमक्या याच पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर रोजी महामानव *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस हा "विद्यार्थी दिवस" म्हणून साजरा होणार आहे.*

 *डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही !!!*

*आजच्या पालकांना, कालच्या विद्यार्थ्यांना आणि  भावी आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी पहिल्या विद्यार्थी दिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा !!!*
*******************

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ